अध्यात्म आणि व्यवहाराचा सुवर्णमध्य : संतुलित जीवन जगण्याची कला
गुरुता–लघुता ग्रंथी : मनाला तरुण ठेवणारी संध्यामंत्रणा.
आपल्या जीवनात दोन वेळा अत्यंत पवित्र असतात — पहाटेची ताजी हवा आणि संध्याकाळची शांत झुळूक. या दोन वेळा मनाशी बोलण्याच्या असतात. मनाशी बोलण्यासाठी भारतीय चिंतनाने दोन अद्भुत ग्रंथी सांगितल्या आहेत — गुरुता आणि लघुता.
जगण्याचे संतुलन राखायचे असेल, मनाला वृद्ध ठेवायचे पण म्हातारं होऊ द्यायचं नसेल, तर या दोन्ही ग्रंथींची निगा राखावी लागते.
सकाळची गुरुता ग्रंथी : ‘पूर्णातून आलेलो मी पूर्णच आहे’. सकाळ म्हणजे नवीन जन्म. मनाला ताज्या ऊर्जेची, उभारीची आणि आत्मविश्वासाची गरज असते.
या वेळी मनाला सांगायचं — “पूर्णमदः पूर्णमिदम्.” ही सृष्टी भगवंताने निर्माण केली आहे आणि ती माझ्यासाठी आहे. हे अहंकार नाही; ही स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव आहे. मी या विश्वाचा तुच्छ भाग नाही—मी विश्वातूनच जन्मलेला आहे. ही गुरुता मनाला ताजं ठेवते. छाती पुढे येते, पावलं भारदस्त होतात, आणि मनातली धडधड उंचावते. यासाठीच भारतीय शास्त्रात “म्हातारा” हा शब्द नाही; “वृद्ध” हा शब्द आहे. वृद्ध म्हणजे जो मनाने मोठा होत जातो — वयाने नव्हे. सकाळची गुरुता मनात तेज निर्माण करते. आणि तेज नसलेले मन हळूहळू सुकत जाते.
संध्याकाळची लघुता ग्रंथी : ‘हे सर्व माझ्या योग्यतेपलीकडचं देणं आहे’. दिवस संपत आला की मनाने आपला अहंकार उतरवायचा असतो. या वेळी मनाशी एकदम प्रामाणिक होण्याची वेळ असते. लोक म्हणतात, “तुझ्यात देव आहे.” ठीक आहे, असू दे. पण पावून तास रांगेत उभं राहूनही अर्धा लिटर रॉकेल मिळत नाही… जर माझी इतकीच पात्रता असेल, तर जे काही आयुष्यात सहज मिळतंय— ते फक्त आणि फक्त भगवंताची कृपा आहे.
मला स्वतःच्या कर्तृत्वाची दर्पोक्ती करण्याची पात्रता नाही. ही संध्याकाळची लघुता मनाला नम्रता आणि कृतज्ञता शिकवते. दिवसभराचा अहंकार धुऊन निघतो. एकच ग्रंथी धरली तर मन बिघडतं. फक्त गुरुता धरली तर मन फुगतं — अहंकार निर्माण होतो. फक्त लघुता धरली तर मन सुकतं — हीनत्व निर्माण होतं. मनाचं संतुलन दोन्हींच्या ताणाबाण्यातून तयार होतं. जसा सूर आणि लय—दोन्ही मिळालं की गाणं घडतं; तसंच जीवन. यालाच आपल्या परंपरेत हिन धर्म आणि श्रेष्ठ धर्म असं म्हटलं आहे.
एक नम्रतेचा धर्म आहे. एक आत्मस्वाभिमानाचा धर्म आहे. दोन्ही हातात धरून चाललात तर मन कधीच कोमेजणार नाही. मन ताजं ठेवा — lifespan नव्हे, mindspan वाढवा. आपण किती जगतो यापेक्षा, आपलं मन किती जिवंत राहतं हा प्रश्न मोठा आहे. सकाळची गुरुता मनाला धैर्य देते. संध्याकाळची लघुता मनाला कृतज्ञता देते. आणि ज्याच्या मनात धैर्य आणि कृतज्ञता हे दोन दिवे सतत पेटते असतात, गुरुता–लघुता ग्रंथी : मनाला तरुण ठेवणारी संध्यामंत्रणा.त्याला जीवनात म्हातारपण कधीच येत नाही.
अध्यात्म पळून जाण्यासाठी नाही
आणि व्यवहार अडकून राहण्यासाठी नाही —
दोघांचा सुवर्णमध्य म्हणजेच जागृत जीवन 🌿








