---Advertisement---

Mastering Your Struggles: Why the Real Victory Is Over Yourself

|
Facebook
---Advertisement---

संघर्षांवर स्वामित्व – जिंकायचं कुणाला?

संघर्ष जीवनात येतो, असं आपण म्हणतो. पण खरं पाहिलं तर संघर्ष येण्याआधी तो आपल्यात उभा राहत असतो. बाहेर दिसणारा संघर्ष हा आतल्या संघर्षाचं केवळ प्रतिबिंब असतं. म्हणून खरा प्रश्न असा नाही की, संघर्ष कसा टाळायचा? तर प्रश्न असा आहे की, संघर्षावर स्वामित्व कुणाचं असावं?

मागील लेखात आपण पाहिलं की आत्मा वसु: आहे—सर्व संघर्षांचा आधार. म्हणजे जीवनात जे जे काही घडतं, त्याचा शेवटचा भार ‘मी’वरच येऊन पडतो. सुख असो वा दुःख, साफल्य असो वा वैफल्य, करुणा असो वा द्वेष—या सगळ्यांच्या मुळाशी मी उभा असतो.

मग संघर्ष जिंकायचा कुणाला?

मनाला?

इंद्रियांना?

बुद्धीला?

की अहंकाराला?

गीतेत भगवान स्पष्ट सांगतात— कर्म इंद्रिये करतात, मन त्याला ओढ देतं, बुद्धी दिशा दाखवते; पण करवून घेणारा अहंयुक्त जीवात्मा असतो.

माणूस अनेकदा असं म्हणतो— “मन वाईट आहे.” “इंद्रियांनी फसवलं.” “परिस्थितीच अशी होती.” पण हा सगळा पलायनवाद आहे. कारण या सगळ्यांच्या मागे मी उभा आहे, ही जबाबदारी स्वीकारण्याची हिंमतच खरी वसुरूपता आहे.

संघर्ष जिंकायचा म्हणजे काय?

संघर्ष जिंकायचा म्हणजे परिस्थिती बदलणं नाही. संघर्ष जिंकायचा म्हणजे आपला केंद्रबिंदू बदलणं. मन आणि इंद्रिये स्वभावतः चंचल आहेत. त्यांच्यावर विजय मिळवायचा म्हणजे त्यांना मारायचं नसतं; त्यांना आपल्या अधिष्ठानाखाली ठेवायचं असतं. जसं घोडे वेगवान असतात, पण त्यांना लगाम लागतो; तसं मनालाही लगाम लागतो—तो लगाम म्हणजे जागृत ‘मी’.

अर्जुन रणांगणावर उभा राहिला तेव्हा त्याच्यासमोर बाह्य युद्ध होतं; पण आत त्याहून भयंकर युद्ध चालू होतं—करुणा आणि कर्तव्याचं, ममत्व आणि धर्माचं. श्रीकृष्णाने त्याला बाहेरचं युद्ध कसं जिंकायचं हे सांगितलं नाही; आधी आतला संघर्ष कोणाच्या हाती द्यायचा, हे सांगितलं. “माझ्या हाती राहा.”

हा वाक्याचा भाव आहे— संघर्ष मनाच्या हाती दिलात तर तो विकार बनेल. संघर्ष अहंकाराच्या हाती दिलात तर तो हिंसा बनेल. संघर्ष भगवंताच्या अधिष्ठानाखाली दिलात तर तो साधना बनेल. वसुरूपता म्हणजे संघर्ष नकोसा मानणं नाही; वसुरूपता म्हणजे संघर्षाला अर्थ देणं. जेव्हा माणूस असं म्हणतो— “हे सुख माझं आहे, हे दुःखही माझंच आहे; हे यश माझं आहे, हे अपयशही माझंच आहे; आणि या सगळ्यांचा आधार मी आहे,” तेव्हाच तो संघर्षावर स्वामित्व मिळवतो.

मग संघर्ष आपल्याला फोडत नाही; तो आपल्याला घडवतो. जीवनात कधी वेग येतो, कधी अवेग; कधी पौरुष, कधी भिरुता; कधी करुणा, कधी द्वेष. या सगळ्यांवर “हे मी अनुभवतो आहे” अशी साक्षीभावाची छाया पडली की आत्मा वसु: म्हणून प्रकट होतो. संघर्ष जिंकायचा म्हणजे शत्रूला हरवणं नव्हे; संघर्ष जिंकायचा म्हणजे स्वतःला विस्कळीत होऊ न देणं. आणि हेच जीवनाचं खरं शिक्षण आहे.

Rupali

नमस्कार, मी रूपाली महादू लामखडे – व्यवसायानं Software Developer पण मनानं सदैव अध्यात्माशी जोडलेली. 2018 पासून अध्यात्मिक प्रवास सुरू झाला आणि श्रीमद्भगवद्गीता माझ्या जीवनाचा दीपस्तंभ ठरली. या ब्लॉगद्वारे माझं आणि माझ्या वडिलांचं एकच ध्येय आहे – गीतेचा दिव्य संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवणे आणि तो प्रत्यक्ष जीवनात उतरवण्यासाठी प्रेरणा देणे.

Leave a Comment